Test 1

Tha Kharbhari.com

11/16/20211 min read

जीवनात प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श हा असतोच. लहानपणापासून वडील हेच ‘आदर्श’ होते. हे कर, हे करू नको! असे त्यांनी मला कधीही सांगितले नाही, परंतु तेच माझे खरे ‘हीरो’ होते, आहेत आणि राहतील.

आम्ही ‘साहित्य सहवास’ मध्ये चौथ्या मजल्यावर राहायचो, त्यावेळी माझे मित्र, पोस्टमन, कचरा नेणारे, घरगडी ह्यांची विचारपूस वडील आपुलकीने करत. त्यांना सणासुदीच्या शुभेच्छा तर द्यायचेच पण वेळप्रसंगी मदतही करायचे. पोस्टमनला तर घरात बसवून पाणी द्यायचे. मला त्यावेळी त्यांच्या अशा वागण्याचा बोध होत नव्हता, पण आता त्यामागची त्यांची भावना कळते. पोस्टमन चार मजले चढून येतो, घरोघरी जातो, त्याला जी मेहनत पडते त्याची जाण आणि कदर माझे वडील करीत असत आणि आता मी मोठा झाल्यावर त्या सगळ्या गोष्टींचे महत्त्व मला कळते. त्यांनी स्वत: त्रास सोसून गरजू लोकांना केलेली मदत मला अजूनही आठवते. आपल्या कृतीने दुसऱ्याला नेहमी आनंद मिळेल असे त्यांचे वागणे होते. अशा वेळी स्वतःची होत असलेली कुचंबणा त्यांनी कधीच जाणवू दिली नाही, याउलट ते नेहमी हसत-खेळत, आनंदी राहायचे. हेच आयुष्याचे सार आहे असे माझे मत आहे.

वडिलांचे विचार त्यांनी माझे साधेपणाने केलेले पालन आणि कुठेही बढाया न मारता अनुसरलेली जीवनपद्धती, हे सर्व लहानपणापासून डोळ्यांसमोर असल्यामुळे, माझ्या मनावर त्यांच्या प्रतिभेचे आणि प्रतिमेचे संस्कार नकळत घडतच गेले. माझे ‘हिरो’ माझे बाबाच! लहानपणापासून कुठल्याही मॅचमध्ये मी विक्रमी किंवा विलक्षण कामगिरी केली की, देवासमोर पेढे ठेवणे हा बाबांनी दिलेला शिरस्ता मी आजही पाळतो. देवाचे आभार मानतो आणि पुढच्या कामगिरीच्या विचारास लागतो. मला घडविण्यात माझ्या मोठ्या भावाचा म्हणजेच अजितदादाचा हातभार फार महत्त्वाचा व मोलाचा आहे. त्याने मला आयुष्यासाठी काही नियम आखून दिले आहेत. उदा., ‘मागचे मागे ठेव, त्याबाबत लोक विचार करतील, तू पुढच्या मॅचचा विचार कर.’ हेच समीकरण माझ्या आयुष्याचे सूत्र ठरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.